
प्रकाशित काव्यसंग्रह
ओघळलेले मोती व काव्यसंपदा
‘ओघळलेले मोती’ काव्यसंग्रहाला प्रसिध्द कवी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आरेम यांची प्रस्तावना लाभली आहे तर २०२२ साली प्रकाशित ‘ काव्यसंपदा’ काव्यसंग्रहाला प्राचार्य किरण सावे (प्राचार्य सोनोपंत दांडेकर महाविद्यालय) यांची प्रस्तावना लाभली आहे.
याशिवाय साहित्यप्रेमी मंडळ बारामती येथून प्रकाशित व प्रा. हनुमंत माने संपादित काव्यप्रतिभा या राज्यस्तरीय प्रातिनिधिक कवितासंग्रहात कवयित्री जया चौधरी यांच्या आठ कविता प्रकाशित झाल्या आहेत त्या खालील प्रमाणे :
१) आधार
२) प्रार्थना
३) आठवणी
४) मानलेली आजी
५) स्वप्न
६) ओवाळणी
७)विश्वास
८) ओघळलेले मोती
मिळालेले पुरस्कार :
काव्यपंडिता पुरस्कार युवा महाराष्ट्र मंच माजी महापौर महादेव देवळे यांच्याहस्ते
प्रशस्तीपत्र साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते
व्यक्तिगत परिचय : कवयित्री जया चौधरी यांचा जन्म १४ मे १९४४ रोजी झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिवणकाम पदविका प्राप्त केली. टेलरिंग व्यवसायास सुरुवात करून सोबत घरगुती पदार्थ बेसन लाडू करंज्या चकली इत्यादी तयार करून त्यांची विक्री करण्यास प्रारंभ केला. सोबत विमा एजेंट म्हणूनही काम करायला सुरुवात केली.१५ मे १९७२ रोजी त्यांचा विवाह लीलाधर चौधरी यांच्याशी झाला.
विविध व्यवसाय करताना त्यांनी संसाराकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी व त्यांचे पती लीलाधर चौधरी यांनी दोन्ही मुलांना डॉक्टर बनवले. साहित्य क्षेत्रात भरारी त्यांनी मारली पण सांस्कृतिक क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रातही प्रचंड काम केले. त्या कामगार कल्याण केंद्र समितीवर कार्यरत सदस्य होत्या.२६ जुलैच्या महाप्रलयात अनेकांचे
संसार उद्ध्वस्त झाले होते त्यावेळेस स्वत पुढाकार घेऊन आणि समाज भगिनीबंधुच्या सहकार्याने दोन ट्रक कपडे गोळा करुन श्रीकांत राऊत आणि अनेक सहकार्याच्या व मदतीने मनोर परिसरातील तादुळवाडी, पारगाव आणि सूर्या नदी जवळच्या परिसरात जाऊन कपडे वाटप केले.
कोल्हापूर महापुराच्या वेळी रुपये ६५ हजारची आर्थिक मदत त्यांनी केली. अनेक आजारी रुग्णांना मोफत औषधे त्या पाठवत असतं किंवा स्वतः घेऊन जात असत. स्वतः मधुमेहासारख्या आजाराने ग्रस्त असतानाही त्या ही मदत करत असत हे विशेष. योगाभ्यास करून त्यांनी स्वतःच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवले होते.
कवयित्री जया चौधरी यांनी देशाटनही केले. काश्मीर, वैष्णोदेवी, भाकरां नानगल धरण, चदीगड ,हरिद्वार ऋषी केस, काशी ,वाराणशी, दिल्ली,आग्रा, मथुरा, आग्रा, हा २१ दिवसांचा प्रवास परिवारासह केला.दिल्ली,सिमला कूलु मनाली, नेपाळ दार्जिलिंग, कलकत्ता जगन्नाथ पुरी, गोर्कण., भुवनेश्वर ताजमहाल कुतुबमिनार यासह विदेश पर्यटनही केले. पटाया, बँकॉक, सिंगापूर, थायलंड सह संपूर्ण यूरोप भ्रमण त्यांनी केले.
जीवन म्हणजे केवळ श्वास घेणे नाही तर दुसऱ्याचे हित जपणे, शक्य होईल तेवढी इतरांची मदत करणे, कोणाबद्दल वाईट विचार न करणे, दुसऱ्याविषयी आपुलकी बाळगणे व विचारांची शुद्धता जपणे हेच जीवन असे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरवून सुखी जीवन जगलेल्या जया चौधरी यांनी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी इहलोकाचा निरोप घेतला. त्यांच्या काव्याच्या रूपाने त्यांचे अस्तित्व सतत आपल्याला जाणवेल.