महाराष्ट्र दिनानिमित्त संपादकीय लेख
अजित हरेश पाटील संस्थापक, संपादक

“जय जय महाराष्ट्र माझा” – प्रत्येक मोबाईलवर अभिमानाची कॉलर ट्यून अनिवार्य व्हावी!
१ मे… महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्णदिन! हा दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा दिवस आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्म्यांनी आपल्या रक्ताचे बलिदान देऊन हा महाराष्ट्र घडवला. त्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा हा दिवस.
आज महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राची माती खाऊन, महाराष्ट्राच्या नावाने व्यवसाय करून अनेक जण जगत आहेत; पण महाराष्ट्राबद्दलचा अभिमान दाखवण्याची वेळ आली की काही लोक मागे हटतात. म्हणूनच शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क तर्फे एक ठाम मागणी करण्यात येत आहे की—
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” ही अभिमानगीत प्रत्येक मोबाईल फोनवर कॉलर ट्यून म्हणून अनिवार्य करण्यात यावी.
ही फक्त कॉलर ट्यून नाही…
हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आवाज आहे!
हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जयघोष आहे!
हा मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा नारा आहे!
जसे काही विशेष प्रसंगी सरकार जनजागृतीसाठी कॉलर ट्यून लावते, तसेच १ मे ते ७ मे या कालावधीत सर्व मोबाईल कंपन्यांनी ही कॉलर ट्यून मोफत उपलब्ध करून द्यावी आणि ती अनिवार्य करावी.
यामुळे काय होईल?
✅ महाराष्ट्र दिनाचे महत्त्व प्रत्येकापर्यंत पोहोचेल.
✅ मराठी संस्कृतीचा प्रचार-प्रसार होईल.
✅ तरुण पिढीला महाराष्ट्राच्या इतिहासाची जाणीव होईल.
✅ महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी अस्मिता समजेल.
शिवस्वराज्य न्यूज नेटवर्कची सरकारकडे मागणी:
महाराष्ट्र शासनाने तात्काळ आदेश काढून सर्व टेलिकॉम कंपन्यांना निर्देश द्यावेत आणि “जय जय महाराष्ट्र माझा” ही कॉलर ट्यून महाराष्ट्र दिनानिमित्त अनिवार्य करावी.
जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
— अजित पाटील
शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क