इंधन बचतीचा सल्ला जनतेला ! परदेश दौरे गमतीला !!
सरकारी पातळीवर इंधन बचत कधी सुरू होणार ?

अजित पाटील
शिवस्वराज्य न्यूज नेटवर्क
देशात महागाई, इंधन दरवाढ, खाद्यतेलाचे वाढते भाव आणि आर्थिक ताण यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना “सोनं खरेदी कमी करा”, “पेट्रोल-डिझेल कमी वापरा”, “खाद्य तेल वाचवा”, “बाहेर जाणं टाळा” असे सल्ले दिले जात आहेत. ते सुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व चार राज्यातील निवडणुका झाल्यानंतर व भरपूर काही मोफत देण्याची आश्वासने देऊन प्रचंड विजय मिळवल्यानंतर.
केवळ भाजपच नाही तर सर्वच पक्षांना जनतेला मोफत वस्तू व पैसा देण्यास किंवा त्याबद्दल आश्वासने देण्यास सरकार बंदी का घालत नाही ? घटनेनुसार निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासने देण्यास बंदी घालता येत नाही पण पंतप्रधान स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना तर हे का सांगत नाहीत.
आणखी एक प्रश्न आज सामान्य माणसाच्या मनात उभा राहत आहे — हे नियम आणि सल्ले फक्त जनतेसाठीच आहेत का?
कारण देशातील अनेक मोठे नेते, मंत्री, अधिकारी आणि राजकीय व्यक्ती स्वतः मात्र मोठमोठ्या गाड्यांच्या ताफ्यात फिरताना दिसतात. एका नेत्यासाठी १० ते १५ गाड्या, पोलीस सुरक्षा, एसी कार्यालये, मोठमोठे कार्यक्रम आणि लाखो रुपयांचा खर्च केला जातो. मग इंधन बचतीची खरी सुरुवात जनतेकडून का आणि सत्ताधाऱ्यांकडून का नाही?
आज एक सामान्य माणूस आपल्या दुचाकीत १०० रुपयांचे पेट्रोल टाकताना दहा वेळा विचार करतो. घर चालवताना खाद्यतेलाचा वापर मोजून करतो. सोनं खरेदी करणे तर मध्यमवर्गीयांसाठी स्वप्न बनत चालले आहे. परदेश दौरे उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत लोकांनाच परवडू शकतात. दुसरीकडे सरकारी यंत्रणांमध्ये होणारी उधळपट्टी, मोठमोठ्या ताफ्यांचा वापर आणि अनावश्यक दौरे यावर कोणी भाष्य करत नाही.
जर खरंच देशाला इंधन बचतीची गरज असेल, तर सर्वप्रथम मंत्री आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून दाखवावा. सरकारी कार्यक्रमांमध्ये गाड्यांचा ताफा कमी करावा. जनतेला संदेश देण्यापूर्वी स्वतः उदाहरण निर्माण करणे गरजेचे आहे. अनेक पाश्चिमात्य देशांत सरकारी अधिकारी चक्क सायकलिंग करत कामावर येतात.
देश बदलायचा असेल तर नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. फक्त सामान्य नागरिकांवर बंधने आणि वरच्या स्तरावर मोकळीक — ही दुटप्पी भूमिका लोक आता ओळखू लागले आहेत.
आज जनता फक्त भाषण नाही तर कृती पाहू इच्छिते. कारण खरा नेता तोच जो स्वतःपासून सुरुवात करतो.
अजित पाटील ajitpatil00747@gmail.com